आध्यात्मिक व पौराणिक महत्त्व

रेषा

श्री हरिहर केशव गोविंद:

श्री हरिहर केशव गोविंद मंदिर प्रवरा नदीच्या काठी असलंले अतिशय पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. हरी म्हणजे श्री विष्णु आणि हर म्हणजे शिव असे मानण्याचा प्रघात असला तरी या स्थानी हरिहर हे श्रीहरि विष्णुनी स्थापिलेल्या शिवलिंगाला संबोधले जाते. या स्थानाचा उल्लेख स्कंद पुराणात प्रवारा महात्म्य या अध्यायात दिसून येतो. पूर्वी या परिसराला बिल्वपुरी असे संबोधण्यात येत असे कारण या परिसरात घनदाट बिल्व म्हणजे बेलाच्या वन होते. सर्वत्र मोहक फुलांच्या वेली परिसरात सुशोभित करीत हवेत सुगंधाची मुक्त उधळण करीत आणि सर्वत्र मोर तसेच वनचर प्राणी विहार करीत असे. अशा या मनोहक परिसराकडे देवीदेवता सुद्धा आकर्षित झाले. एकदा शिवपार्वती पृथ्वी भ्रमणासाठी या परिसरात आले असता इथले निसर्गसौंदर्य पाहून पार्वती माता मोहित झाल्या. हा निसर्गाचा आनंद लुटत भ्रमण करीत असतांना पार्वतीमाता तहानेने व्याकूळ झाल्या, सर्वत्र शोध करुनही पाण्याचा एक थेंबही मिळेना, तेव्हा महादेवांनी एक बेलाचे पान तोडून जिमिनीवर टाकताच तेथे एक सुंदर सरोवर निर्माण झाले. या सरोवराचे पाणी पिलाल्याने पार्वतीमाता तृप्त झाल्या आणि या सरोवरात स्नान करणाऱ्यांना इच्छित संततीचा लाभ होईल व चारही पुरुषार्थ प्राप्त होतील असा वर देत या सरोवराला बिल्वतीर्थ असे नाव दिले.

याच बिल्वतीर्थ परिसरात त्रिपुरासुराच्या वधासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विष्णूसह इतर देवतांनी स्वतंत्र लिंग स्थापन करून शिवआराधना केली होती.

बदलत्या काळाप्रमाणे परिसराचा व मंदिराचा विकास होत गेला. देवस्थानाच्या जागृतीची अनेक लोकांना प्रचिती येऊ लागली. हरिहरांच्या कृपेने दुर्धर आजार बरे होऊ लागले, त्यामुळे दुरदुरहून भाविक मोठ्या संख्येने येऊ लागले. जनार्दन पंत काईत या आदिल शहाच्या दिवाणांना सुद्धा श्रीहरिहर सेवेची प्रचिती आली. पुढे जनार्दनपंतांनी केशव गोविंद बनाची व मंदिराची देखभाल, सेवा, पूजा-अर्चा, आरती आदी उपक्रम नित्यनियमाने चालू ठेवले. मंदिराचे बांधकाम करीत भव्य दीपमाळ, पडशाळा व ओवरी बांधण्यात आली. या काही दगडी वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. सुमारे ८०० ते ९०० वर्षाचा पुरातन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या आध्यात्मिक व निसर्गनिर्मित देवस्थानाला असंख्य भाविक आवर्जून भेट देतात व देवसृष्टीचा अनुभव घेतात, कलियुगात भक्तराज नागू, डांगु, केशवदास स्वामी महाराज, परमहंस विद्यानंद महाराज या संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे.